ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष





⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

▶️📜 २४ फेब्रुवारी इ.स.१६६५
छत्रपती शिवाजी महाराजांनी कारवारला जराही तोशीस न देता कारवार सोडले. पण इंग्रजांना लुटण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली. ते जाता जाता म्हणाले, " आमची होळीची शिकार शेरखानाने घालवली !"
नुकतीच होळी व शिवरायांचा ३६ वा वाढदिवस "तिथीने" साजरा झालेला होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 २४ फेब्रुवारी इ.स.१६७०
छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी "सकल सौभाग्य संपन्न सोयरा बाई साहेब" यांना राजगडावर पुत्र लाभ झाला,"रामराजे" नाव ठेवण्यात आले, रामराजे पालथे उपजले, राजियासी हे वर्तमान कळविण्यात आले...
राजियासी हे वर्तमान समजल्यावरी त्यांच्या मुखातून उदगार निघाले - "रामराजे पालथे उपजले मग दिल्लीची पात-शाही पालथी घालतील."

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 २४ फेब्रुवारी इ.स.१६७४
#म्यानातून_उसळे_तरवारीची_पात
#वेडात_मराठे_वीर_दौडले_सात
कवी कुसुमाग्रजांनी रचलेल्या या ओळी लता मंगेशकरांच्या आवाजात ऐकताना आपणांस स्फुरण चढल्याशिवाय राहात नाही. अंगावर शहारे आणणारा इतिहास कविवर्य कुसुमाग्रजांनी स्फूर्तीगीतातून जिवंत केला.
छत्रपती शिवरायांच्या एका शब्दाखातर खरोखरच सात साहसी वीरांनी शत्रूकडे दौड घेऊन स्वराज्यासाठी बलिदान दिले. सेनापती प्रतापराव गुजर आणि सहा सरदारांनी शौर्य गाजवलेला तो दिवस होता २४ फेब्रुवारी १६७४.
बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले. महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश दिला. मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरीस आणले. वेळ प्रसंग पाहून बहलोलखान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी मेहेरबान झाला. युद्धात शरण आलेल्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाईधर्म सांगत होता. प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली. तो जीव वाचवून गेला.
छत्रपती शिवाजी महाराजांना खबर पोहोचली, “प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला!” आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली. त्या पत्रात एक वाक्य असं होतं की, "बहलोलखानाला मारल्याशिवाय आम्हाला रायगडी तोंड दाखवू नका ". त्याकाळी मावळ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेला जीव पाहता ही किती भयंकर शिक्षा सुनावल्या गेली होती हे लक्षात येईल.
महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी? हा एकच प्रश्न कडतोजींना दिवसरात्र सातावीत होता. जीवाची तगमग होत होती. सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले. सर्वत्र जासूद पाठवले. माग काढा ! फक्त माग काढा आणि सांगा कुठे आहे तो गनीम . त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवता येणार नाही.
अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता. मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले. काही मैल गेल्या नंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे? तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे.
बस! प्रतापरावांना राग अनावर झाला. त्या हेराला त्यांनी तसाच छावणीत पाठवला सैन्याला स्वारीचे आदेश दिला. पण… पण… सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना थांबवल्या गेलं नाही. त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला.
अवघे सात मराठे सुमारे पंधरा हजारच्या सैन्यावर चढाई करतात. यात काय नाही? दुर्दम्य विश्वास , पराकोटीची स्वामीनिष्ठा सारं – सारं काही ! प्रतापरावंचं ठीक पण त्या सहांपैकी एकाचे ही पाय अडखळले नाहीत. केवळ मरणावर चालून गेलेले ते सात वीर हे मराठी इतिहासातील एक स्वर्णीम पराक्रम पर्व आहे.
#दगडात_दिसतील_अजुन्बी_तेथल्या_टाचा ,
#ओढ्यात_तरंगे_अजुनी_रंग_रक्ताच

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 २४ फेब्रुवारी इ.स.१६८०
चोपड्याच्या इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना लिहीलेल्या पत्राची नोंद!
"मोरोपंतांच्या हाताखालील छत्रपती शिवाजी महाराजांची सेना अद्याप सीमेवरील लढ्यातच गुंतलेली आहे. जे काही किल्लेकोट हस्तगत करता येतील तितके ते घेत आहेत. मुल्हेरच्या किल्ल्याबद्दल त्यांना फार कसकस लागून राहिली आहे. ते दोन तीन वेळा किल्ल्याजवळ छापा घालण्यास येऊन गेले. परंतु तो त्यांना घेणे शक्य झाले नाही. फितुरी झाल्याशिवाय त्यांना तो गड घेणे क्वचितच शक्य होईल. हनुमंतगड त्यांनी घेतला. ते यापुढे कोणत्या हालचाली करू इच्छितात ते सांगता येणे शक्य नाही. ते आपला मोर्चा कोठे वळवितात हे थोड्याच दिवसांत कळेल. काही म्हणतात की, ते सुरतवर जाणार तर काही बुन्हाणपुरवर जातील असे सांगतात".

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 २४ फेब्रुवारी इ.स.१७२८
उत्तरेकडून निजामाला मिळणारी मदत तोडून त्याला पुणे सोडून उत्तरेत येणे भाग पाडण्याचा श्रीमंत बाजीरावांचा डाव सफल होत होता. बुन्हाणपूरावर बाजीराव जाण्याची अफवा निजामाला खरी वाटून तो त्या दिशेने लगबगीने निघाला खरा, पण मध्ये अजिंठ्याच्या डोंगररांगेतून अचानक खाली आलेल्या बाजीरावांच्या झंझावाती फौजांनी त्याला अक्षरशः हैराण केले. औरंगाबादेच्या पश्चिमेस जवळपास सात कोसांवर असणाऱ्या पालखेड येथे निजामाचा तळ पडला असतानाच २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री मराठी फौजांनी पालखेडला येऊन निजामाला चहूकडून वेढा घातला. निजामाचा तोफखाना मागे नगरलाच असल्याने मराठी फौजांना आता त्याची भीती नव्हती. बाजीरावांनी निजामाच्या पाण्याच्या स्रोतावर चौक्या बसवल्या. निजामाचे पाणी तुटले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 २४ फेब्रुवारी इ.स.१७७९
राघोबादादा यांनी कायमस्वरुपी झाशीला जाण्यासाठी प्रयाण केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 २४ फ़ेब्रुवारी इ.स.१८१२
पुण्यात शनिवार वाड्यास मोठी आग

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 २४ फेब्रुवारी इ.स.१८२४
उमाजी नाईकांच्या जीवनातील काळा दिवस
नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी झाला. इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात उमाजी नाईक यांनीच सर्वप्रथम क्रांतीची मशाल पेटवली. त्यांचे हे पहिले बंड मानले जाते. इंग्रजांची आर्थिक नाडी आवळण्याचा त्यांनी सर्वप्रथम प्रयत्न केला. २४ फेब्रुवारी १८२४ या दिवशी इंग्रजांचा ‘भांबुडा' येथील कडेकोट बंदोबस्तात असणारा खजिना उमाजींनी आपल्या सशस्त्र साथीदारांच्या साहाय्याने लुटला आणि इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"🚩

Comments