ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
▶️ ३ फेब्रुवारी इ.स.१६६१
छत्रपती शिवाजी महाराज राजगडावरून कोकणात आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ ३ फेब्रुवारी इ.स.१६७०
राजगडावरून कोंढाणा घेण्याची जय्यत तयारी झाली.
शिवछत्रपतींचा आणि माँसाहेब जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन तानाजी मालुसरे, शेलारमामा आणि सूर्याजी मालुसरे मावळ्यांच्या तीन तुकड्या घेऊन कोंढाणा घेण्यासाठी ४ फेब्रुवारी च्या रात्री तयारीनिशी बाहेर पडले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ ३ फेब्रुवारी इ.स.१७३६
पेशवे अनेक खंडण्या घेत कुकसी फत्ते करून लुनावडा, बासवाडा, डोंगरपूर आदि राजपुतान्यातील अनेक राजेरडवाड्यांकडून सत्कार स्वीकारित उदेपूर राण्याच्या भेटीस गेले. चंपाबागेत राण्याने बाजीरावांच्या भेटीसाठी खास शामियाना उभारला. पेशव्यांनी जाऊन राणाजींची
भेट घेतली तेव्हा बरोबरीच्या नात्याने बाजीराव पेशव्यास जवळील सुवर्णमंडित सिंहासनावर बसण्यास राणाजीने विनंती केली. ह्या विनंतीचा अव्हेर पेशव्यांनी मोठ्या नम्रतेने केला. पेशवे राणाजीस म्हणाले, “राणाजी आपण चक्रवर्ती आहात, आपल्या बरोबरीने मी बसणे अयोग्य होईल.” असे बोलून पेशवे राणाजीच्या जवळील पण थोडेसे सखल असलेल्या आसनावर अधिष्ठीत झाले. मग उभयताचे संभाषण सुरू झाले. त्यात राण्याने पेशव्यांच्या खंडणीच्या मागण्या मान्य केल्या आणि पेशव्यास दिनांक ३ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी १७३६ पर्यत ठेवून घेतले. ह्या मुक्कामात पेशव्यास ठिकठिकाणच्या राजेरजवाड्यांकडून मेजवानीदाखल अनेक मौल्यवान चिजा मिळाल्या. दरम्यान बादशहाने ज्या सादतखानास मराठ्यांवर चालून जाण्यास सांगितले होते त्याचा धुव्वा आडासचा जमीनदार बुंदेला ह्यानी खानाशी मोठे झुंज देऊन उडविला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ ३ फेब्रुवारी इ.स.१७७९
राघोबादादा महादजींच्या लष्करात आल्यावर त्यांच्या इतमामास साजेशी वागणूक महादजींनी त्यास दिली. एक दीड महिना दादास वडगावी लष्करात ठेवून घेतले. तिथे त्यांनी अमृतरावांचे दुसरे लग्न करविले. दादास झाशीस ठेवण्याचे ठरले. त्यापूर्वी दादासाहेब व शिंदे, होळकर यात एक करार जाबता झाला. त्या करारात असे ठरले की, दादास १२ लक्षाची नेमणूक द्यावी. त्यांनी स्नान संध्या करून झाशीस हावे. राज्यलोभाने दौलतीचा वारसा करू नये. पंतप्रधान सवाई माधवराव राज्याचे धनी, त्यांचे पश्चात चि. बाजीराव (दुसरे) धनी. असे उभयता सरदार व चि. बाजीराव यांनी पूर्वील चालीप्रमाणे धनी व कारभारी या अन्वये वर्तावे. दिनांक ३ फेब्रुवारी १७७९ रोजी दादांचे कारभारी चिंतो विठ्ठल, सदाशिव रामचंद्र व खरकसिंग हे दादांबरोबरच शिंद्यांचे लष्करात आले. त्यापैकी चिंतो विठ्ठल व सदाशिव रामचंद्र यांस दादांबरोबर हिंदुस्तानात जाण्यास परवानगी दिली. खरकसिंग हा नारायणरावाचे खुनात सामील होता. म्हणून त्यास देहांत शिक्षा दिली. दादा पुण्यास न जाता २४ फेब्रुवारीचे सुमारे परभारे उत्तरेस निघून गेले आणि कारभारी मंडळी पुण्यास येऊन पुरंदरास पेशव्यांच्या दर्शनास गेली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ ३ फेब्रुवारी इ.स.१८३२
#आद्यक्रांतिकारी_उमाजी_नाईक_स्मृतिदिन
आद्यक्रांतिकारी 'उमाजी नाईक खोमणे' यांना पुण्यातील मामलेदार कचेरीच्या आवारात इंग्रजांनी फासावर लटकावले. १८१८ नंतर संपूर्णपणे इंग्रजांचे राज्य प्रस्थापित झाल्यावर उमाजी नाईक यांनी आपल्या साथीदारांसोबत पुन्हा एकदा लढा सुरू केला. मात्र ते १८२६ साली पकडले गेले. त्यांच्यावर खटला चालवून त्यांना इंग्रजानी फासावर लटकावले. उमाजी नाईक हे खऱ्याअर्थाने स्वातंत्र्ययुद्धाचे पहिले हुतात्मे आहेत ... !!!
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
..
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment