ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
📜 २६ मार्च इ.स.१६६७
छत्रपती शिवाजी महाराज श्रीनृप शालिवाहन शके १५८९ पल्वंग नामसंवत्सर, चैत्रशुद्ध पौर्णिमा रोजी सिंधुदुर्गावर पोहोचले. याचवेळी हिरोजींनी या रयतेच्या राजाचे चरणकमल चुनखडी व जस्त मिश्रणावर मुद्रित करून सिंधुदुर्ग किल्ल्यावर इतिहासाचे एक सोनेरी पान साकारले होते. तीन वर्षे सुरू असलेले काम शिवरायांनी पाहिल्यानंतर सिंधुदुर्ग कृतकृत्य झाला होता. सिंधुदुर्गाच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या हिरोजींनी महाराजांकडे एक इच्छा मागितली, ते म्हणाले, "महाराज या किल्ल्यावर तुम्ही सदैव असावे असे आम्हाला वाटते. आमची एक इच्छा आहे, तुमचे चरणकमल आमच्या नेहमी दृष्टीस पडावेत. "छत्रपती हिरोजींकडे बघतच राहिले. महाराजांनी होकार देताच चुनखडी आणि जस्ताचे मिश्रण असलेले तबक हिरोजींनी मागविले. दोन तबके पुढे आणण्यात आली आणि हिरोजींनी महाराजांना आपले एक पाऊल या तबकात ठेवण्यास सांगितले. महाराजांनी आपला डावा पाय तबकात ठेवला. तर दुस-या तबकात आपला उजवा हात. स्वत: राजांनी.. दुस-या कुणीही नव्हे, चुन्यामध्ये उठविले आपल्या हाताच्या पंज्याचे आणि पावलांचे ठसे हिरोजींचा चेहरा प्रचंड उजळला. त्यांना कधी नव्हे तो आनंद झाला होता. तुतारी निनादली तोफांचे बार उडाले पुन्हा चौघडा वाजू लागला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ मार्च इ.स.१६६७
औरंगजेब बादशहाने 'मिर्झाराजा जयसिंग' यांची दक्षिणेची सुभेदारी काढून घेतली आणि 'शहजादा मुअज्जम' ला दक्षिणेचा नविन सुभेदार नेमले.
.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ मार्च इ.स.१६८१
(चैत्र वद्य द्वितीया, शके १६०३, संवत्सर दुर्मती, वार शनिवार)
औरंगजेबाने मुसलमानी प्रजेवरही कर लावला.
पैशांच्या टंचाई मुळे त्याने मुसलमानी जनतेवर २.५% नजर लावून खजिना वाढीकडे जातीने लक्ष दिले. याआधीच बिगर मुसलमानी प्रजेवर साडेतीन टक्के कर लावला होता
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ मार्च इ.स.१७३७
चिमाजी अप्पांनी साष्टी जिंकले
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ मार्च इ.स.१७५५
तुळाजीने १७५४ मध्ये इंग्रजांची अनेक जहाजे पकडली, काही जाळली. तुळाजीने आपल्या आरमारात अनेक नवीन जहाजे बांधविली व त्यांवर पगारी यूरोपीय कामगार नेमले. यामुळे पश्चिम किनाऱ्यावर तो जणू अनभिशिक्त राजात समजला जाऊ लागला. आंग्रे यांच्याशी मराठ्यांचे संबंध बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवेच्या कारकीर्दीत बिनसले. हे तंटे कमी करण्याऐवजी पेशव्याने ते वाढविले, असा शाहूंचा स्पष्ट आरोप होता. पेशव्यांचे इंग्रज आणि पोर्तुगीज या पाश्चिमात्य सत्तांशी मैत्रीचे संबंध होते. इ.स.१७५६ मधे तुळाजी आंग्रेंच्या विरुध्द पेशवे आणि इंग्रजांनी संयुक्त आघाडी उघडली. पेशव्यांनी जमिनीवरून व इंग्रजांनी पाण्यावरून हल्ला केला. त्याचा फायदा घेऊन आंग्रे बंधूचा मिळेल तितका प्रदेश जिंकण्याचा सपाटा पेशव्यांनी लावला. तुळाजीने घाबरून नानासाहेब पेशव्यांना पत्र लिहून उभय पक्षांचा घरोबा पूर्वीपासून चालत आहे, त्याची अभिवृद्धी व्हावी असे कळविले; तथापि पेशव्याने २६ मार्च १७५५ रोजी तुळाजीविरोधी संयुक्त मोहिमेस प्रारंभ केला. अखेर तुळाजीचा पराभव होऊन विजयदुर्ग फेब्रुवारी १७५६ ला इंग्रजांच्या हाती पडला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ मार्च इ.स.१७७४
बारभाई कारस्थान - कासेगांवची लढाई
उत्तर पेशवाईत रघुनाथरावाने अन्यायाने पेशवेपद मिळविण्यासाठी केलेला प्रयत्न अयश्स्वी करणाऱ्या मराठी सेनानी व मुत्सद्दी यांचा संघ. नारायणरावाच्या वधानंतर पेशवाई मिळविण्यासाठी रघुनाथरावाने केलेल्या कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी प्रामुख्याने हा स्थापन झाला. बारभाई म्हणजे बारा माणसांचे मंडळ असे नसून काही एका हेतूने एकत्र जमलेला समूह होता. बारभाई मंडळ स्थापन झाले, तेव्हा त्यात सखाराम बापू, भगवंत बोकील, बाळाजी जनार्दन उर्फ नाना फडणीस, त्रिंबकराव पेठे, हरिपंत फडके, मालोजी घोरपडे, महादजी शिंदे, तुकोजी होळकर ही प्रमुख मंडळी होती. रघुनाथरावाला पदच्युत करून नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई हिच्या नावाने कारभार करावा तिला मुलगा झाला तर त्यास, नाही तर दत्तक घेऊन त्याच्या नावाने कारभार करावा, असे सुरुवातीस कारस्थान ठरले. यालाच बारभाई कारस्थान म्हणतात. सखाराम बापू व नाना फडणीस हे कारभारी आणि त्रिंबकराव पेठे यांच्याकडे फौजेची अखत्यारी ठेवावी असे ठरले. पार्वतीबाई आणि गंगाबाई यांना मारण्याचा कट उघडकीस येताच सखारामबापू नाना फडणीस, हरिपंत फडके यांनी गंगाबाईला पुण्याहून १७ जानेवारी १७७४ रोजी पुरदंरच्या किल्ल्यावर नेले आणि तिच्या नावाने कारभार सुरू केला. त्यामुळे रघुनाथराव व बारभाई संघ असा उघड सामना सुरू झाला. यातूनच २६ मार्च १७७४ रोजी कासेगावची लढाई झाली. यात त्रिंबकराव पेठे मरण पावले आणि रघुनाथरावाला बऱ्हाणपूरकडे जाण्यास संधी मिळाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments
Post a Comment