ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜१० जून इ.स.१६४०
#हिंदवी स्वराज्याचे पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांच्या ३८१ व्या जयंती निम्मित विनम्र अभिवादन सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचा जन्म जावळीच्या खोऱ्यातील गणी गावात झाला. चार छत्रपतींच्या सोबत इमानाने राहिलेलं मोजक्या घराण्यातील एक गोळे घराणे, ह्याच गोळे घराण्यातील इतिहासात एकनिष्ठ म्हणून उल्लेख आढळतो. पिरंगुट या गावी त्यांची पवित्र समाधी आहे व जगदीश्वराचे मंदिर पण आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १० जुन इ.स.१६५८
औरंगजेबाचा पहिला दरबार आग्रा येथे भरला. आता औरंगजेब आग्रा येथे शिरला. थोड्याच दिवसांत शहाजहान कैद झाला आणि औरंगजेबाचा पहिला दरबार १० जुन इ.स.१६५८ रोजी आग्रा येथे भरला. औरंगजेबाने पहिले सिंहासनारोहण केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १० जुन इ.स.१६६१
(ज्येष्ठ वद्य अष्टमी, शके १५८३, संवत्सर प्लव, वार सोमवार)
कल्याण-भिवंडी महाराजांच्या ताब्यात!
महाराजांनी कल्याण-भिवंडी मोहीम करून या भागावर आधिपत्य प्रस्थापित केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १० जुन इ.स.१६६४
अजीजखान वेंगुर्ला येथे मृत्यू पावला. अजीजखान आल्याचे कळताच वाडीकर लखम सावंत त्यांच्या भेटीस गेला. भेटीत ठरल्याप्रमाणे सावंत कुडाळकर चाल करून गेला. शर्थीची झुंज मांडून त्याने मराठ्यांना पराभूत केले. कुडाळ सावंतांच्या ताब्यात गेले. अजीजखान वेंगुर्ला येथे गेला होता. या मुक्कामातच तो मरण पावला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜१० जून इ.स.१६८०
(आषाढ शु.२ शुक्रवार)
मोरोपंत व अण्णाजी आपल्या लोकांनिशी रायगडाहून पन्हाळ्याकडे निघाल्यानंतर लवकरच रायगडावर सरनौबत व नायकवाडी यांनी १६ मे रोजी किल्ला ताब्यात घेऊन फितुरीतील लोकांना कैद केले व आपले चौकी पहारे बसविले. त्यानंतरछत्रपती संभाजीराजांचे सासरे पिलाजीराव शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराजांची अनुज्ञा मिळवून १५,००० स्वारांसह येऊन रायगडचा बंदोबस्त केला. पन्हाळगडावरून निघून छत्रपती संभाजी महाराज दिनांक १० जूनला रायगडला पोचले. त्याच
दिवशी दरबार भरवून राज्यकारभारास प्रत्यक्ष प्रारंभ केला. परत आल्यावर छत्रपती संभाजीराजे यांनी सोयराबाई व
दुसऱ्या तीन मातांचे सांत्वन केले असे परमानंद स्पष्ट लिहितात. छत्रपती संभाजी महाराज रायगडी आल्यानंतर परत क्रियाकर्म केले व दानही दिले. त्यानंतर २७ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी पुतळाबाई राणीसाहेबांनी अग्निप्रवेश केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜१० जून १६८०
राजापूरचे सुरतेला पत्र
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर इंग्रजांच्या इस्ट इंडिया कंपनीने छ.संभाजी महाराजांकडे बक्षिस चालू ठेवण्यासाठी विनंती केली होती. ह्या गोष्टीचा पाठपुरावाही ते अगदी न चुकता करताना दिसतात. ह्या बाबतीतला पहिला संदर्भ जून १६८० मध्ये, म्हणजे छ. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर दोन महिन्यांनी पाहायला मिळतो.
In our last to your Honour, wee advised that wee had an order for the coconutts at Achara, but the suddain alteration of this state put an end to all our former proceedings, for not long after came a new Soobedarr put in by Sombagee Rajah who acquainted us that without an order from him wee could receive noe more bucksis, upon which wee wrote to the Rajah to satisfy him of the troubles wee are always at with the Soobedarr to receive the bucksis given by Sevagee Rajah, desiring him to give an order, in answere to which he advised us that at present he had other concernes in hand, but when at more leizure he would examine our account, which all signifies noe more than just a deniall.
आमच्या आधीच्या पत्रातून आम्ही आपल्याला कळवले होते की अचऱ्याहून आम्हाला नारळाची मागणी आली होती पण राज्यातील अकस्मिक घडामोडींमुळे सगळी गडबड झाली आहे. नुकताच संभाजी राजांचा सुभेदार इथे आला होता व त्याने सांगितले की राजांकडून बक्षिसाचे आदेश असल्या शिवाय आम्हाला अपेक्षित सवलत देता येणार नाही. त्यावर आम्ही राजाला कळवले की आम्हाला शिवाजीकडून मिळालेल्या बक्षिसासाठी सुभेदाराकडून अनेकदा अडचण निर्माण केली जाते. आम्ही राजाला विनंती केली की सुभेदाराला आवश्यक आदेश देऊन ह्या अडचणीतून आम्हाला मुक्त करावे. पण राजाने आम्हाला कळवले की सध्या तो इतर बाबींमुळे व्यस्त आहे तरी त्याला थोडी उसंत मिळताच तो ह्यात लक्ष घालेल. आमच्यासाठी हे त्याच्या नकारासमानच आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १० जून इ.स.१६८१
औरंगजेबचा मुलगा पाछ्चा उर्फ़ अकबर छत्रपति संभाजी महाराजांच्या शरणार्थ आला. त्यास संभाजी राजांनी नेतोजी पलकर आणि हीरोजी फर्जद यान समवेत पाली येथील सुधागड जवळ ठेविले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १० जुन इ.स.१६८३
फिरंग्यांनी बिघाड केला व रेवदांडास वेढा घातला म्हणून संभाजीराजे स्वार होऊन राजापुरास गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜१० जून १६८९
छत्रपती राजाराम महाराजांची पहिली लढाई
११ मार्च १६८९ क्रूरकर्मा औरंगजेबाने छत्रपती शंभुराजांची हत्या केली आणि मराठ्यांचे स्वराज्य ढवळून निघाले. शिवप्रभूंच्या हस्ते स्थापन झालेली हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगडाला इतिकादखानाचा वेढा पडायला सुरुवात झाली होती. गडावर राजमंडळी होती. येसूबाई, त्यांचा पुत्र शाहू आणि त्यांचा दीर म्हणजे शिवपुत्र राजाराम महाराज अशा खास मंडळींचे वास्तव्य होते त्यावेळी राजाराम महाराज अवघे १९ वर्षांचे होते. प्राप्त परिस्थितीत बेलाग रायगड सोडून राजधानीबाहेर पडून मुघलांशी संघर्ष चालू ठेवण्याचा सल्ला येसूबाईंनी दिला जो योग्य होता, सूत्र त्याप्रमाणे फिरली. राजाराम महाराज व त्यांच्या दोन राण्या ताराबाई व राजसबाई यांच्यासह गुप्तपणे रायगड त्यांनी सोडला.
शत्रूस हुलकावणी देऊन जावळीच्या खोऱ्यातून प्रतापगड गाठला परंतु ही चाल लवकरच झुल्फिकारखानाच्या (इतिकादखान) लक्षात आली आणि त्याने लागलीच पाठलागासाठी फतेहजंगखानास पाठवले. तो पोहचेपर्यंत महाराजांनी लढाईची तयारी केली आणि इतिहासाला अपरिचित अशी मुघल व राजाराम महाराजांची पहिली लढाई दिनांक १० जून १६८९ ला प्रतापगडाच्या पायथ्याला पार ह्या गावी झाली. १९ व्या वर्षी केलेली लढाई महाराजांच्या स्वभावातील धाडस दाखवते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १० जून इ.स.१६९६
केज धारूर (मराठवाडा) येथील अधिकारी मुहंमद शरीफ याला चंदेरी कापड खरेदी करण्यासाठी पाठविण्यात आले. बुन्हाणपूरचा सुभेदार इनायतखान याला लिहून हटकरांशी झालेल्या चकमकीचा तपशील मागावा अशी बक्षीउल्मुल्क मुखलिसखान याला आज्ञा झाली.
बनारसचे विणकर कापडावर कुराणाच्या ओळी काढीत. हा प्रकार बंद करण्यात यावा आणि असे कापड हुजुरात पाठविण्यात यावे अशी आज्ञा झाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜१० जून १६९६
इंग्रजांच्या पत्रातील एक नोंद...
"मराठ्यांचा एकूण कालखंड १५० वर्षे साधारण, या कालखंडात एकाही राजाचा खून किंवा राजाला कैद करून स्वघोषित राजा झालेल्याचे उदाहरण जवळपास नाही " .. एक वेगळीच घटना हे दर्शवते .. अशी संधी त्या नामांकित सेनापतीस चालून आलेली असून सुद्धा असे घडलेले नाही जे मुघलकाळात सय्यदबंधूंनी केले. सेनापती संताजी घोरपड्यांना ही संधी होती. १६९६ मेअखेर - जूनप्रारंभी जिंजी दरबारात सेनापती व छत्रपती मध्ये वितुष्ट आले, बिघाड झाला. इतका की इंग्रजांच्या १० जून १६९६ च्या पत्रातील एक वाक्य असे "मराठा सरदार संताजी व बहिर्जी घोरपड्यांच्या मागून न जाता राजाराम महाराजांशी एकनिष्ठ राहतील"
संताजी जिंजीबाहेर पडले आणि त्यांच्यावर स्वतः राजाराम महाराज धनाजी, अमृतराव, हणमंतराव या मराठा सरदारांसह चालून गेले. आयेवारकुटी येथे लढाई होऊन संताजी विजयी झाले आणि छत्रपती त्यांच्या कैदेत पडले !! वास्तविक संताजींकडे २० हजाराच्यावर फौज होती. महाराष्ट्र-कर्नाटक प्रांतात त्यांचा चांगलाच दरारा होता. प्रत्यक्ष छत्रपती कैदेत सापडला होता. स्वघोषित राजा व्हायची अथवा आपल्या नियंत्रणाखाली कोणाला तरी करायची आयती संधी होती. पण या धामधुमीच्या काळात जिथे काही मराठ्यांकडून स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी फितुरीसह कोणतेही पाऊल उचलले जात होते तिथे संताजी सारखा बलाढ्य सेनापती लढाईनंतर अटकेत असलेल्या छत्रपतींची हात बांधून क्षमा मागतो आणि त्यांना मुक्त करून जिंजीत व्यवस्थित पोहोचवण्याची व्यवस्था करतो. याचवेळी सुरतकर इंग्रज लढाईसंदर्भात लिहितायत (१८ जुलै १६९६ - ज्युलिअन दि) " Zulphikar offered him (संताजी घोरपडे) a vast reward in the King's (औरंगजेब) name to surrender him (राजाराम महाराज) up; and the King himself promised to make him (संताजी घोरपडे) a Barra Hazari Umrao". झुल्फिकार खानाने बादशहाच्या वतीने राजाराम महाराज यांच्या बदल्यात इनाम देऊ केले तसेच बादशहाने बारा हजारी उमराव करतो असे आश्वासन दिले असा याचा अर्थ निघतो. तत्कालिन परिस्थिती मध्ये अनुकलता असूनही असे काहीही घडले नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜१० जून इ.स.१७६८
पेशवे माधवराव आणि राघोबादादा यांसमध्ये धोडोपची लढाई. माधवरावने लढाई जिंकून राघोबास पराभूत केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही. आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment